
माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने सर्व भारतीयांच्या मनात देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम राहावी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्यात व त्यांचे संस्मरण व्हावे या उद्देशाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत येत्या ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर झंडा’ हा विशेष उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.
माजलगाव उपविभागातील सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन स्वयं प्रेरणेने आपापल्या घरावर उभारावा. भारतीय ध्वज संहिता २००२ भाग-१ मधील परिच्छेद १.२ मधील बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क अथवा खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतुदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल. ग्रामीण भागात ग्राम पंचायत कार्यालय, रास्त भाव धान्य दुकाने, बचत गट केंद्र ई. ठिकाणी तसेच नागरी भागात स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत वॉर्ड स्तरावर राष्ट्रध्वज वितरण आणि विक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत.
चौकट
राष्ट्रध्वज उभारताना भारतीय ध्वज संहितेचे काटेकोर पालन व्हावे आणि जाणते – अजानतेपणाने राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, तसेच भारतीय ध्वज संहितेत नमूद पद्धतीनेच झेंड्याची विल्हेवाट लावण्यात यावी, याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी व ‘हर घर झंडा’ या विशेष उपक्रमाला जास्तीत जास्त प्रमाणात प्रतिसाद द्यावा.- श्रीमती नीलम बाफना,उपविभागीय अधिकारी, माजलगाव.









