[
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारीच एका प्रचारसभेत बोलताना ‘नियतीचे बोलावणे आल्यावर सर्वांनाच जावे लागते’ असे भावूक विधान केले होते. त्यानंतर 4 दिवसांतच त्यांनी अकाली एक्झिट घेऊन अवघ्या महाराष्ट्राला शोकसागरात लोटले. त्यांच्या निधनामुळे हजारो कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले असून, प्रत्येकाच्या मनात आपल्या घरातीलच कुणीतरी गेल्याची भावना निर्माण झाली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात अकाली निधन झाले. बारामती येथील प्रचारसभेला जाणाऱ्या अजित पवारांच्या विमानाला विमानतळापासून अवघ्या 50 मीटर अंतरावरच अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यातून प्रवास करणाऱ्या अजित पवारांसह सर्वांचाच जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. आज त्यांच्या पार्थिवावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होत आहेत. या निमित्ताने त्यांनी गत शनिवारी एका प्रचारसभेत केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. काय म्हणाले होते अजित पवार? अजित पवार या सभेत म्हणाले होते, हे जग कायमचे राहणार नाही. तुम्ही – आम्ही आज असू, उद्या नसू. काळाच्या, नियतीच्या पुढे बोलावणे आले तर प्रत्येकाला जायचेच आहे. पण आपण आपल्या हयातीत काम करत असताना राजकारण हेच सर्वस्व नाही. राजकारण सुरूच असते. निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचे असते. पण ज्यातून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे हे पाहिले पाहिजे. मी जनतेच्या प्रेमाच्या बळावर धडाडीने काम करतोय. तुम्ही सर्वजण माझ्या पाठिशी आहात. तुमचे प्रेम, विश्वास ही माझी शक्ती आहे. हीच माझी सर्वात मोठी प्रेरणाही आहे. या प्रेमाच्या जोरावरच मी धावपळ करत असतो. या निवडणुकीत मी एवढी धावपळ केली की, सकाळीच सांगलीत जायचो, तिथे सभा करायचो, तेथून लातूरला यायचो, तिथे सभा करायचो, लातूरहून परभणी, परभणीतून अमरावती व तेथून नागपूरला जाऊन रात्री मुक्कामाला पुण्यात यायचो, असे ते म्हणाले होते. ही सभा आटोपून अजित पवार लगेचच ते दुसऱ्या एका सभेला निघाले होते. त्यानंतर बुधवारी त्यांचे दुःखद निधन झाले. अजित पवार नाहीत ही भावनाच सहन न होणारी 5 दिवसांपूर्वी भाषणातून कार्यकर्त्यांना मोजून मापून बोलण्याचा व राजकारण करण्याचा सल्ला देणारे अजित पवार आज आपल्यात नाहीत ही भावनाच त्यांच्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही. त्यामुळे ते त्यांना अखेरचा निरोप देताना धाय मोकलून रडत आहेत. अजित दादा परत या, असे म्हणताना आपला आक्रोश व्यक्त करताना दिसून येत आहेत. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/ajit-pawar-death-baramati-plane-crash-update-137069134.html
नियतीचे बोलावणे आल्यावर जावे लागते:अजित पवारांच्या तोंडून 5 दिवसांपूर्वी निघाले शब्द अन् आता अचानक घेतला जगाचा निरोप




