धर्मांध शक्तींना धडा शिकवा; राहुरीत ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार, राजकीय समीकरणे बदलणार?
राहुरी (प्रतिनिधी):
“देशात आणि राज्यात हिंदू-मुस्लिम वाद उकरून काढून सर्वसामान्यांचे लक्ष मूळ प्रश्नांवरून भरकटवणाऱ्या धर्मांध शक्तींना आता खतपाणी घालू नका. विकासाच्या नावावर शून्य आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार, अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगरसेवक, शेतकरी पुत्र संतोष चोळके यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. ६) मोठ्या शक्तीप्रदर्शनाने दाखल करण्यात आला. यावेळी आयोजित मेळाव्यात साठे यांनी प्रस्थापितांवर जोरदार हल्लाबोल केला.
या मतदारसंघातील नगर आणि पाथर्डी तालुक्यातील गावांना प्रस्थापितांनी केवळ मतपेढी म्हणून वापरले, असा आरोप योगेश साठे यांनी केला. ते म्हणाले की, “एका गरीब मराठा कुटुंबातील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला, संतोष चोळके यांना उमेदवारी देऊन वंचितने प्रस्थापितांच्या घराणेशाहीला थेट आव्हान दिले आहे. ही निवडणूक सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी आणि उपेक्षितांच्या अस्तित्वाची लढाई आहे.”
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना साठे पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही, दुधाला दर नाही आणि शेतीला दिवसा वीज नाही. या प्रश्नांवर बोलायचे सोडून प्रस्थापित नेते केवळ भावनिक राजकारण करत आहेत. राहुरी आणि नगर तालुक्यातील तरुणांना रोजगारासाठी वणवण करावी लागते. एमआयडीसी आणि स्थानिक उद्योगांचा पत्ता नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी संतोष चोळके यांच्यासारख्या जनसामान्यांच्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे.”
९ एप्रिलला ‘ॲड. बाळासाहेब आंबेडकर’ यांची सभा; विरोधकांचे धाबे दणाणले
या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय ॲड. प्रकाश आंबेडकर हे येत्या ९ एप्रिल २०२६ रोजी राहुरी तालुक्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य मेळाव्याद्वारे प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला जाईल. या सभेमुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघणार असून प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. या मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले आहे.
२२३-राहुरी विधानसभा मतदारसंघातील गावागावांमधील जनतेने आणि राहुरी तालुक्यातील मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, परिवर्तनासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे कळकळीचे आवाहन यावेळी करण्यात आले.












